सफ़र में धूप तो होगी..

2 प्रतिक्रिया

सहजा-सहजी एखादी गोष्ट मिळणे आणि तीच गोष्ट ठेचकाळत, धडपडत ‘मिळवणे’ ह्यात खूप मोठं अंतर असतं. थोडक्यात म्हणायचं तर त्या गोष्टीची खरी किंमत म्हणा किवा महत्त्व म्हणा, धडपडल्याशिवाय कळत नाही. खूप कमी लोक असतात ज्यांना सहज सगळं उपलब्ध होऊनही ह्या सत्याची जाणीव असते.

एवढा क्लिष्ट विचार करण्याचं कारण? fresher मंडळी join झालीये ४-६ महीन्यापूर्वी, सगळेच जवळपास campus selection मधून आलेत. त्यातली एक आमच्या team मध्ये ‘assign’ झाली. वातावरणाशी जुळू देत म्हणून सुरुवातीला थोडं दमाने घेतलं. नाही म्हटलं तरी college life चा feel जायला थोडा काळ लागतोच. तर हळू हळू जरा लहान-सहान assignments दिली, वेळेचं वगैरे बंधन नाही, त्यातून त्यानी काहीतरी शिकावं आणि तयार होत जावं एवढाच प्लान. अन ह्या सगळ्यात जे काही अनुभवायला मिळतंय ते निव्वळ अनपेक्षित आहे. अमुक-तमुक technology मध्ये मला काम करायचं नाहीये, त्यात मला interest नाहीये अशी सुरुवात झाली. अजून लहान आहेत म्हणून जरा वेळ काढून समजावून बघितलं, सुरुवातीला कसं सगळं कठीण वाटतं, एकदा जमलं की मग कसं interesting वाटेल इति. इति. पण नाही म्हणजे नाही..पुढचा response होता:”मला नाही वाटत की माझा ह्यात interest develop होईल म्हणून!” आता मात्र खरच चाट पडले मी.

हो, म्हणजे आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय करायचे नाहीये ह्याची clarity नक्कीच असावी, पण एवढी? म्हणजे अजिबात प्रयत्न करायचा नाही अन आधीच शस्त्र टाकायचे? इच्छा नाही की करायचा कंटाळा? सहज job मिळणे एवढे कठीण नको ते बळ देते? अन मग खरच वाईट वाटतं, बाहेर कितीतरी ख-या अर्थाने ‘लायक’ पोरं-पोरी रोज खस्ता खातायेत, रोज सकाळी उठलं की नव्या दमाने लागायचं, माहीत नसलेल्या शहराला आपलं बनवत सगळे रस्ते पिंजून काढायचे..तास-अन-तास वाट बघत interview च्या process मधून जायचं, rejection पचवायचं अन त्यातूनच धडा घ्यायचा..पुन्हा स्वत:च स्वत:ला सावरायचं, घरच्यांना धीर द्यायचा अन त्यांच्याकडून घ्यायचाही, सोपं काहीच नसतं त्या काळात..रोज पडायचं अन मग उठून पुन्हा चालायला लागायचं..ही सगळी धडपडच तर शिकवून जाते खूप काही..
नकळत आयुष्यभराचा धडा देऊन जातात हे अनुभव..अन तेच तुम्हाला जमिनीवर ठेवतात, भरकटू देत नाहीत. संघर्षासाठी बळ लागतं तसं संघर्षातून बळ मिळतंही.

त्यामुळेच अश्याप्रकारच्या दिव्यातून प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं. स्वत:च स्वत: ला घडवण्याचा तो एक भाग ठरतो..अन ह्यात स्वयंप्रेरणेचा जो काही कायमचा ठेवा गवसतो त्याचं महत्त्व वेगळंच. अशी प्रेरणा तुम्हालाही ‘चालतं’ ठेवते अन इतरांनाही नकळत मार्गदर्शक ठरू शकते.

थोडक्यात काय तर ‘मूळं’ पक्की होत जातात, कुठल्याही वादळात टिकून राहण्यासाठी..

निदा फाज़लींच्या ‘सफ़र में धूप तो होगी’ मधल्या ह्या ओळी म्हणूनच खूप काही सांगून जातात

“हर इक सफ़र को है महफूस रास्तो की तलाश
हिफाज़तो की रिवायत बदल सको तो चलो..”

शेंगा..टरफलं…

10 प्रतिक्रिया

कॉलेज ला असतानाचा प्रसंग आठवला सकाळी..Engineeringचे शेवटचे वर्ष होते, झालं काय की होळी वगैरे खेळण्याची hostel मध्ये permission नव्हती..त्यामुळे प्रश्न नव्हताच.. तरी होत्या काही वल्ली मैत्रिणी, ज्यांनी ‘शेवटच’ वर्ष ह्या tag खाली अचानक आम्हाला surprise दिले..झाले, warden २-३ रूम सोडून राहायला होती..ओळीने  उभं केलं सगळ्यांना..झाल्या प्रकारची आम्ही सगळ्यानी माफी मागून घेतली अगदी मनापासून ..४ वर्षात आमची एकही  तक्रार गेलेली नव्हती म्हणून आम्हालासुद्धा जरा guilty वाटतच होतं, त्यामुळे म्हणलेलं sorry सुद्धा अगदी आतून आलेलं होतं..पण तिचं मन नाही भरलं तेवढ्याने..बोलली ‘शिंग फुटली काय ४ वर्षात!’ मग मात्र माझ्यातली सुप्त झाशी झाली जागी, झाप झाप झापलं मीच तिला (नीट शब्दात)..एवढंच पटवून दिलं की झाल्या प्रकाराची जर आम्ही कबुली देऊन मनापासून माफी मागतोय तर तुम्ही योग्य शब्दात काय ते झापा ना, तुमच्या बरोबरीने आम्ही उद्या बाहेरच्या जगात पाउल ठेवणार आहोत तेव्हा शिंग वगैरे बोचरं वाटतं..group मधल्या बाकी सगळ्या चकीत, माझं हे रूप त्यांनाही नवीन, त्यामुळे जे झाले त्यापेक्षा जे होतंय त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता..

पण होतं ते खरं..शेंगा खाल्ल्याचं आम्ही मान्य केलं, टरफलेही उचलतो म्हणालो मनापसुन..

हे सगळं आठवण्याचं कारण…सकाळी सकाळी office मध्ये एकाने वस्तुस्थिती जाणून न घेता तोफा डागायला सुरुवात केली, सुरुवातीला उगाच का blame game वाढवा म्हणून मी शांततेने घेतलं..वाटलं कपातलं वादळ ठेवा कपात. पण अजूनच चेव चढला समोरच्याला..मग झाली ना माझ्यातली झाशी जागी..मी शेंगा कश्या खाल्ल्या नाही हे मोजक्या शब्दात दिलं पटवून…मग झालं शांत वादळ (आता शांत झालंय की ही वादळापूर्वीची शांतता आहे हे कळेलच मागे पुढे :) )..असो..

पण हे खूप common आहे..घर असो की office, नसते वाद चिघळवून मुख्य गोष्टीवरचा focus घालवला जातो..समोरच्याला मनापासून चूक मान्य असेल तर काय गरज आहे वाद वाढवायची..माफी मागून अन पुन्हा असं होणार नाही अश्या शब्दात माफ करून प्रश्न सुटत असतील तर मग बोचरे शब्द वापरून उगाच वादाचं chewing-gum का करायचं, कपभर पाण्याने विझणारी आग बंब भर पाणी लागण्याइतकी का उगाच भडकावायची?? तसंच समोरच्याचं खरच चुकलंय का ह्याची पण आधी खात्री घ्यावी करून, उगाच चालत्या गाडीत अंदाज न घेता चढून त्रास का करून घ्यावा ?

अन  चुकणा-याने ही लक्षात ठेवावे..
शेंगा खाल्ल्या असतील तर म्हणायला काही कमीपणा वाटायला नको …”मी शेंगा खाल्ल्या, उचलतो मी टरफले, पुन्हा कचरा करणार नाही!”
अन नसतील खाल्ल्या तर नीट शब्दात मांडा टरफले का उचलणार नाही ते..मात्र खाऊन, खाल्ल्या नाही म्हणू नका :)

Keep it simple silly :D

जगण्याचा अर्थ कळे[ना]…

4 प्रतिक्रिया

आळस, कंटाळा ह्यांचा पसारा खूप वाढलाय आजकाल, जो भेटतो तो वैतागलेला, कंटाळलेला; थोड्या फार प्रमाणात कमी-जास्त. पण negative energy चं प्रमाण वाढलंय वातावरणात. ५-६ वर्षापूर्वीचे आपण अन आजचे आपण, विश्वास बसत नाही, एवढं काही चोरून नेतं (अन तेही तुमच्या नकळत) एक routine आयुष्य तुमच्याकडून? जगाचे अन जगण्याचे वेग-वेगळे काने-कोपरे कळले की प्रवाहातले एक बनून जायला वेळ लागत नाही..ordinary life . स्पर्धा अन तिथे टिकून राहण्याची धाव-पळ प्रत्येकालाच वेळे-आधी म्हातारं बनवते आहे, ते ही पुन्हा नकळत! शाळा, कॉलेज, नोकरी, घर, लग्न, संसार ह्या मार्गाने जाणं जसं compulsory च आहे अन गेलात तरी तिथून करावयाचा प्रवासही एका ठराविक मार्गाने अन ठराविक साच्यातच करणं must आहे ही विचारसरणी नकळत खोल रुजलेली असते..खूप कमी लोकांना साच्याबाहेर विचार करायला जमतं अन त्यातूनही खूप कमी जणांना साच्याबाहेर जगायला जमतं…

म्हणजे साचेबद्ध जीवन जगणं सटर-फटर आहे असं म्हणायचं नाहीये मला..जे काही जगताय ते आतून अन समाधानाने जगलं गेलं पाहिजे अन तेच आज दुर्मिळ होत चाललं आहे, शांती हरवते आहे. दोन घडीचा वेळ afford करू शकत नाही आज-काल कुणी कारणमीमांसा करायला..बस वाहत राहायचं..मग फोफावत जातात तऱ्हे-तऱ्हेची शिबिरं, counselling अन महागडी outings..म्हणजे हे सगळं मनापासून होत असेल तर प्रश्न नाही पण काही जण शांती-समाधान वगैरे मिळवण्यासाठी जातात अश्या ठिकाणी. असं ठरवून नाही ना मिळत ह्या गोष्टी, त्या रोजच्या आयुष्याचा एक भाग असायला अन व्हाव्या लागतात.

शेवटी कसं जगावं ही सुद्धा एक वृत्ती असते , रडत-पडत की हसत-खिदळत. पळत्याच्या पाठी धावत राहिलं तर रस्ता कधीच संपणार नाही, अन रस्त्याला फाटे तर फुटत राहणारच..बरं पळायचंच आहे तर पळा पण किती, का अन कसं एवढं ठरवून पळा. म्हणजे हे सगळं जमणं तसं सोपं नाहीये पण खूप कठीणही नाहीये , जमवायचं म्हटलं तर जमतं सगळं. पूर्वीचे लोक होतेच ना सुखी-समाधानी आज एवढ्या सोयी-सुविधा नसताना, कारण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठीचा प्रवासच त्यांना घडवायचा..आज-काल प्रवास होतोच कुठे, नुसतीच धाव-पळ जी आयुष्य काय आहे हे कळायच्या आतच सर्व काही घेऊन जाते.

परवा office मधून निघायला आधीच खूप उशीर झालेला, तश्यात tyre puncture, झालं! चीड-चीड सुरु, सगळ्या जगात आपल्यालाच कसा त्रास आणि tensions आहेत इति इति पोकळ विचार. puncture काढणारा मुलगा जेमतेम १५ वर्षाचा असेल, एकदम हसमुख. त्याची परिस्थिती, काम करण्याची जागा काहीच चांगल्या condition मध्ये नव्हतं तरी हा सर्व-सुखी. मन लावून काम करतोय, अजिबात अढी नाही त्रासाची. कुठून शिकला असेल तो हे सगळं? शाळेत जातो का हे विचारल्यावर शांतपणे ‘नाही’ एवढंच म्हणाला. नंतर मलाच वाटून गेलं की मी उगीच कीडा सोडून त्याचं आयुष्य अस्वस्थ केले की काय. पण तो त्याच्या मूळ स्वभावानुसार पुन्हा निर्विकार..

किती, कसं अन का पळायचं आहे ह्याची calculations त्याला अगदी clear होती वाटतं.
त्या दिवसापासून रोज office ला येता-जाताना त्याच्या दुकानवजा टपरीवर लक्ष गेल्याशिवाय राहत नाही, स्वत:ची calculations पडताळून बघता येतात त्यानिमित्ताने..

[Un]common sense…

8 प्रतिक्रिया

प्रसंग १:
सकाळची वेळ, office ची pantry ह्या वेळी सगळ्यात जास्त गजबजते..तश्यात दोन मुली pantry च्या दाराच्या अगदी मधोमध उभ्या..बरं संवाद तरी काय? पहीली दुसरीला तिच्या ड्रेसबद्दल विचारते “ही बांधणी print की गढवाली?”, दुसरीला त्यातलं विशेष काही माहीत नाही..त्यामुळे उगाचच सुरु चर्चा..बाकी लोक ताटकळत, आतले आत अन बाहेरचे बाहेर..कित्येकांना असतील महत्त्वाची कामं आपापल्या जागेवर जाऊन..

प्रसंग २:
वेळ दुपारची, स्थळ पुन्हा office, लोक इतक्यातच जेवण आटोपून पुन्हा आपापल्या जागी परतलीत, सगळीकडे शांतता..अन अचानक जोर-जोरात गप्पा, हसणं-खिदळणं सुरु झालं, work-hall मध्ये ठेवलेल्या सोफ्यावर ४-५ मुलींचा घोळका येऊन बसला..अन विषय तरी काय? “मेहेन्दीमे अंडा डालो तो मस्त होते है बाल” दुसरी: “अर्रे दही डालो, उससे भी मस्त होते है”..अन इति इति ..माझ्या शेजारी बसलेला colleague अन मी हैराण..नेमके आमचे cubicle त्या सोफ्याशेजारी..२ वेळा त्यांच्याकडे कटाक्ष टाकून ही no use ..ज्ञान पाजळा, नाही कोण म्हणतंय, पण जरा आजू-बाजूचे भान ठेवा..

प्रसंग ३:
पुन्हा office, एक meeting सुरु आहे (महत्त्वाची असू देत किवा नसू देत), एकीचा mobile वाजला..वाटलं silent करून ठेवेल पण कसलं काय..madam SMS-SMS खेळत बसल्या…१५-२० मिन्स, काही वाटलं नसतं जर mobile च्या keypad चा आवाज झालं नसता, मोठा अन irritate करणारा आवाज होता..अक्षरश: सगळ्यांचा कटाक्ष टाकून झाला, पण दृष्टी हरवलेल्यांना काय दिसणार..

प्रसंग ४:
आहेत काही नमुने office मध्ये, seniors आहेत म्हणायला..पण जेव्हा कुणी काही निमिताने sweets किंवा chocolates आणतं सगळ्यांसाठी, हे दोघं निवांत भर-भरून खिसे अन drawers भरतात!(LITERALLY)..देणाऱ्याने न राहवून “अजून खूप लोक राहीलेत” म्हणलं तरी घेणं-देणं नाही, पुन्हा संध्याकाळी निघताना काही शिल्लक आहे की नाही हे बघायला येणार अन असेल-नसेल ते सगळं न विचारता उचलून नेणार..! शब्द नाहीत..

प्रसंग ५:
स्थळ: Office cafeteria, उपवासाच्या फराळाचं counter, genuine उपवास करणारे रांगेत उभे असताना उपवास नसलेली ४-५ डोकी(?) रांगेला तडा देत खरकटं ताट घेऊन उपवासाचं काय बरं घेता येईल ह्याचा विचार अन मग नंतर कृती करत शिरली, बरं वाढून घेताना चमचा ताटातल्या आधीच्या जेवणाला लागून आपण तो उष्टा करतोय एवढं कळण्याइतका धीर नाही..

असे बरेच काही अनुभवायला मिळते, मान्य व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे..पण हक्कांना कुठे अन कसं अन कुठल्या limit पर्यंत वापरावं ह्याची तरी जाणीव ठेवा..सार्वजनिक ठिकाणी वावरताना दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी काळजी तर नक्कीच घेता येण्यासारखी आहे, पण एवढा विचार करतंय कोण? ह्या लोकांना तिथल्या तिथे त्यांची चूक जाणवेल अशी कृती करायलाही आपण ४ वेळा नको तितका विचार करतो..पण हे लोक आपल्याच दुनियेत असतात.अतिक्रमण अन अतिरेक अश्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी..

उथळपणे वागताना खोलात शिरायची गरज असतेच असं नाही पण खोलात शिरण्यासाठी आधी उथळपणा भेदायलाच लागतो ..

आलीया भोगासी…

2 प्रतिक्रिया

“कामवाली बाई” नेहमी जिव्हारी लागणारा जिव्हाळ्याचा विषय असतो.
पहीला प्रश्न: मिळेल का कुठे?
नंतर: कशी असेल अन package किती द्यावे लागेल?
उत्तर काहीही असले तरी गत्यंतर नसणारे प्रश्न: दांड्या किती मारेल? वेळेवर येईल का? काम नीट करेल का?
अश्या सगळ्या steps पार केल्यावर सुरु होतो रोजचा खेळ..
जुळवून घ्यावं लागतं, म्हणजे सासू/सूनेचं नातं असल्याप्रमाणे..
कुठे अन कशी ठिणगी पडून भडका उडेल सांगता येत नाही..

नवीन घरात shift झाले अन शोधली एक बाई..पहील्या भेटीतच click झालं: प्रकरण जरा सरळ नाही..नखरे झेलण्याची सवय करून घ्यावी लागेल, अन जरा दमानेही घयवे लागेल..
खेळ सुरु..
बाई येणार अन जाणार..
मनाला येईल तसंच काम करणार: valid सूचनांना entertain केले जाणार नाही..
दांडी? वाटेल तेव्हा..
रोजची वेळ? Flexi-time तिच्या वेळेप्रमाणे जुळवून घ्या..
कामही एकदम चाल-ढकल..
तरी म्हटलं, जाऊ देत..सुरुवातीचे काही दिवस जरा adjust होण्यात जाऊ द्यावेत..समोरची व्यक्ती समजून घेते म्हटल्यावर जरा बदल होईल..
पण नाही, जाणीवेचा गाव माहीत नाही तिला..

join करून २ महीनेही नाही झाले अन बाईनी आज सकाळी फर्मान सोडले: “पगार वाढवून द्या १०० रु. नी, परवडत नाही”
अवाक मी: “आधीच व्यवस्थित आहे पगार, लगेच नाही वाढवता येणार..”
ती: “ते काही नाही, सगळीकडे जास्त आहे”
मी: “घरात आम्ही फक्त ३ माणसं, भांडी/काम पण खूप कमी असतं, बरोबर आहे सध्याचा पगार”
आवाज चढलेली ती: “नाही नाही, ५० तरी वाढवाच”
(आता मात्र चीडूनही शांत असलेली) मी: “नाही, इतक्यात तरी जमणार नाही”
बाईंचा आवाज बंद, म्हणजे समजून घेणे की महीना संपल्यावर बाई येणार नाहीत..
नको येऊ देत, पैसे थोडे-फार वाढवलेही असते पण बाईंचं काम तेवढं worth ही नाहीये..
हवे तेव्हा पैसे वाढवून देऊन चुकीचे संकेत द्यायचे नाहीयेत मला..

ती गेली काम आवरून, पण माझ्या डोक्यातून निघायला तयार नाही..

काय पण मजेशीर गोष्ट आहे:
काल संध्याकाळी भांडी लावताना नुसती नावाला घासलेली/धुतलेली भांडी बघून मी ठरवलं होतं, उद्या बाईना जरा समजवून सांगावं लागेल..
सकाळी ती आल्यावर बोलणार होते तितक्यात वाटलं “जाऊ देत, कशाला तिची सकाळ (अन त्या-योगे पूर्ण दिवस) खराब करायचा? बोलूया नंतर, तिलाही चार घरची कामं अन स्वत:च्या घरचे ताप असतील”

अन ती अशी बेदीक्कत माझी सकाळ, दुपार, संध्याकाळ खराब करून गेली :)

मी पण कुणाकडून अपेक्षा ठेवतीये..
त्यापेक्षा तयारीला लागायला हवं..
थोड्याच दिवसात आता “नवा गडी, नवे राज्य..”
आलीया भोगासी..असावे सादर!

जाणीव…

5 प्रतिक्रिया

एखादं काम (लहान असू देत किवा मोठं), धाकामुळे केलं जातं किवा जाणीवेतून
जाणीवेतून केलं तर दोघांना समाधान – ज्याच्यासाठी केलं त्याला अन ज्याने केलं त्यालाही..
जाणीव त्या कामाचं ओझं कमी करते तर धाक त्याला नको तितकं असह्य करतो..
जाणीव त्या कामाने ज्याला हात-भार लावला त्याच्याबद्दलचा आदर दर्शवते (अन तसंच करणा-याबद्दलही आदर निर्माण करते) तर धाक उपकाराच्या भावनेला खत-पाणी घालतो..
जाणीव आपलेपणा वाढवते, धाक एकटेपणा..
जाणीव मनापासून असते;जास्त काळ टिकणारी , तर धाक वर-वरचा; रात गई, बात गई..
जाणीव निरीक्षण शिकवते, धाक गणन..
जाणीव नेते सकारात्मकतेकडे, भीती गिरवते नकारात्मकतेचे धडे..
आज-काल कमी होतं मात्र असं…
जाणीव स्वत:ची, घराची, देशाची, जगाची, निसर्गाची..किंवा अजून कशाचीही..
मी का करू? मी एवढंच करणं अपेक्षित आहे..
आयुष्याचा पाया निर्माण करणा-या बालपणापासून हे भूत मानगूटीवर बसतं – उदा. अभ्यास: जाणीवेपेक्षा धाकातूनच जास्त केला जातो..अन मग होत जाते सवय सगळं काही उथळपणे करण्याची..मूळांना अशी दल-दलीची सवय झाल्यानंतर पोरांकडून धाक दाखवून पंख लाऊन उडण्याची अपेक्षा करणा-या पालकांना दोष तरी द्यायचा कसा.. कुणाच्याही गावी ‘जाणीव’ नाही, काय चाललंय अन का चाललंय..निरीक्षण नाहीच..नुसती गणती करायची, गणती घड्याळ्याच्या ठोक्यांची, आल्या-गेल्या दिवसाची, स्पर्धा-परीक्षांची, मार्क्सची-स्कोरची, पहिल्या/दुस-या/तिस-या क्रमांकाची…
शांत बसून विचार करायला वेळ आहे कुणाला..कुणीतरी पुढे जाईल हा ‘धाक’ स्वस्थ बसू देत नाही..एवढं उथळ होऊन जातं सगळं की ‘धाका’ चीही ‘जाणीव’ उरत नाही..मग होत जातं सगळं स्वैर..
अन बरंच काही..
फार सोपं अन फार कठीणही आहे, जाणीव असणं अन ती पेलणं..ती एक साधना आहे अन साध्यही..ज्याला जमली त्यालाच जमली

पुनर्जन्म…

5 प्रतिक्रिया

ह्म्म्म…एक काळ लोटलाय इथे लिहून…म्हणजे गेल्या काही दिवसात इतरांनी विचारण्यापेक्षा मीच स्वत:ला कितीदातरी हा प्रश्न विचारला आहे…”आजकाल(?) काही लिहीत नाहीस?” का वगैरेचा विचार करायला गेलं तर समाधानकारक असं उत्तर अजूनही मिळालं नाहीये, मध्येच एकदा वाटलं की writers’ block म्हणतात तसला काही प्रकार असेल, पण ‘writer’ वगैरे म्हणवून घेणं म्हणजे जरा अतिच झालं…बरं, उगाच प्रयत्न करून, ओढून-ताणून लिहीण्यात ही काही राम नाही..(आताही तसंच काहीसं होतंय की काय अशी शंका येतेच आहे)

अवघड आहे खरं, आतून शांत वाटत नाही तोवर मनापासून मनातलं काही उतरत नाही…आणि मग कळतंय ‘आतल्या’ शांतीबद्दल विचार करायला तरी कुठे वेळ मिळतोय सध्या…घड्याळाच्या काट्यावर सगळा हिशोब सुरु आहे…जमा तशी काहीच नाही, सगळा खर्चच खर्च…झोपताना कितीला उठायचा हा हिशेब, उठल्यावर सकाळच्या ‘tasks’ चा हिशेब: डबा, आवरा, ट्रेन पकडा, office गाठा अन office गाथा इति, office मधला हिशेब न केलेलाच बरा, निघताना पुन्हा पुढचा ताळेबंद..गाडी, बनवायचं काय रात्रीच्या जेवणात अन असतंच पुन्हा कामाचं लहान-मोठं शेपूट, लहान असलं तर मानायचा त्यातला त्यात आनंद…काय पण आनंदाचे निकष झालेत! हसावं की रडावं कळत नाही..हा हिशोब काही जमत नाही…’एक दिवस’ ह्या एककात सध्या सगळे calculations, हीच झाली चौकट.., scope थोडा वाढतो महिना-अखेरीस किवा सुरुवातीला, जेव्हा monthly बिलं विचारशक्तीला जरा वेगळा वाव देतात..अन त्याहून पुढं जायचं म्हटलंच तर मग आहेत घराचे EMIs, ५ वर्षांनी स्वत:ला कुठे बघतेस ह्या प्रश्नाचं ५ वर्षापूर्वीच अन आजचं उत्तर ‘उत्तर-दक्षिण’ ध्रुव…आता कुणी विचारलं तर पहिलं डोक्यात येतं ‘home loan nil करायचं!!!!’ काय पण महत्त्वाकांक्षा :( … एवढं बदलतं चित्र?

५ वर्षापूर्वी जग बदलू शकण्याची उमेद, आज स्वत:चा mood बदलण्याचीही मारा-मार..

Priorities एवढ्या बदलतात? Rather आपण एवढे वहावत जातो त्यांच्यासोबत? ह्या प्रश्नाला उत्तर नाही सहज, प्रतिप्रश्न मात्र हजार आहेत…त्यात शिरायला नकोच…एक एक प्रतिप्रश्न म्हणजे excuse , स्वत:ला नको ते समजावण्याचा..आहे खरं depressing, त्याला justification नाही..पण असल्या (-.-) ग्राफ मध्ये (+,+) पण खूप आहेत…विचार केला नव्हता अश्या ब-याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या…चांगली ‘लोकं’ भेटलीत आजवरच्या धावपळीत ज्यांनी वर मांडलेला हिशोब सुसह्य बनवला…’भौतिक’ म्हणा हे सारं पण it counts..’जगण्याची जाणीव’ जीवंत आहे तोवर ताप नाही..असं म्हणून over-optimistic होत नाही…पण at least असं म्हणून नको त्या निराशावादासून लांब तरी राहता येतं..

तेवढीच महत्त्वाकांक्षांची उजळणी..अन त्यायोगे पुन्हा एक पुनर्जन्म…स्वत:चा :)

Life has no U turn/s…

11 प्रतिक्रिया

एक मनाने स्वच्छ व्यक्ती अन दुसरी जरा तिरसट, एकाच वेळी दोघांसोबत interaction करायचा योगायोग… तिरसटाच्या वाट्याला जाण्याची तुमची नेहमीप्रमाणे अजिबात इच्छा नाही…पण तिरसटाला स्वभावत: वाकड्यात जाण्याची खुम-खुमी…(म्हणजे मी नेहमी असं ऐकलंय की कुणाच्या वाटेत खुड-बुड केल्याशिवाय तो ‘कुणी’ तुमच्या वाटेला उगी येत नाही, पण अनुभव काहीतरी वेगळंच दाखवतात..काळ बदलला की लोक?…की ती एक मानसिकता आहे जी बदलत नाही? …असो…)

तर तिरसट (ति.) गेलाच वाकड्यात…तुम्ही दुर्लक्ष करता…तरीही ति. त्याच track वर…म्हणजे तळपायाची आग मस्तकाला जाईल असं काहीतरी….पण मग सोबत असलेल्या स्वच्छ व्यक्तीने हे ओळखावं अन त्याच्या एका छोट्या कृतीतून परिस्थिती सांभाळावी…अजूनही तुमची आग मस्तकात, पण फक्त त्या स्वच्छ व्याक्तीखातर तुम्ही ति. च्या नादी नाही लागत…आदराचा भाग होता स्वच्छच्या प्रति, बाकी काही नाही…

दिवसात तुमच्यासोबत घडणा-या १००० गोष्टींपैकी ही १…दिवस संपता संपता ह्या गोष्टीवरचे विचार पुन्हा सुरु होतात…मी जे केले ते योग्य होते का? ति. ला आपण उगाच बढावा दिला का? आपण उत्तर द्यायला हवं होतं का त्याच तोडीचं? आपण स्वत:चा ‘मान’ ठेवला नाही का?

पण मग हळू-हळू उत्तरं मिळत जातात…ति. च्या level ला जाऊन स्वच्छचा अनादर करण्याचं पाप किवा सल जास्त बोचरी ठरली असती…अन त्याहूनही बोचरं ठरलं असतं: तुम्ही तुमच्यातली एक चांगली मानसिकता ति. साठी बळी दिली… ति. असाच तर शिरतो….हळू-हळू…पसरत जातो तुमच्यात, तुमच्याही नकळत…शिरकाव करूच द्यायचाच आहे तर मग स्वच्छाने केलेल्या त्या छोट्या कृतीमधल्या हेतूचा का नको…दुस-याने निखळ आनंद मिळेल तर पहील्याने फक्त चीड-चीड अन द्वेष…घेऊन जाणार कुठे?

चांगल्या-वाईटाचा हिशोब शेवटी ‘त्या’ ला द्यायचा असतो/नसतो..माहीत नाही…

पण जाताना स्वत:ला स्वत:चा हिशोब करायचा/द्यायचा  झाला तर ति. च्या गावी जायचेच कशाला?

‘जाताना’ पश्चाताप करण्याचे क्षण जेवढे कमी तेवढी शांती जास्त :)

Because…Life has NO ‘U’ turn/s….at anytime…


माणसा माणसा…

2 प्रतिक्रिया

बातम्या ऐका किंवा newspaper वाचा, आज-काल frustrating बातम्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे की त्यातून येणारा सुन्नपणा सवयीचा व्हायला लागलाय. असं व्हायला नकोय खरं तर. एखादी गोष्ट सवयीची झाली की मग तिला काही अर्थच उरत नाही. पण अश्या घटनांचा वेग मनाला सुन्नपणातून बाहेर यायला वेळच नाही देत. मग रोज मरे त्याला कोण रडे…
अवघड झालंय सगळंच. खून काय, लुटा-लूट काय, बलात्कार काय…धरबंध नाही उरला…एक ‘जीवंत’ माणूस समोरच्या माणसाच्या ‘अस्तित्वाचा’, भावनांचा अजिबात विचार न करता त्याचं आयुष्य इतक्या सहज बदलू शकतो? अधिकार दिला कुणी? क्षणभरचं स्वार्थी सुख(?) असं दुस-याच्या राखरांगोळीने रंगवता येतं? एकदा मिळणारा मनुष्य जन्म (मग तो स्वत:चा असू दे वा समोरच्याचा) असा धुळीला मिळवताना काहीच वाटत नसेल का अश्या दगडांना? कीड्या-मुंगीसारखी माणसं जन्माला येतात अन जातात…अश्या अचेतन जीवांना ‘माणूस’ म्हणून ह्या जमिनीवर पाठवताना ‘त्याच्या’ मनात तरी काय सुरु असतं? असं करून ‘त्यानेच’ ‘त्याचे’ व्याप नाहीये का वाढवून घेतले? जगाच्या एका कोप-यात घडणा-या अश्या घटना ऐकून आपल्याला एवढा विषण्ण व्हायला होतं तर मग अक्ख्या संसाराचं हे असलं विष ‘तो’ कसं काय पचवतो, कुठं काढत असेल ‘तो’ हे frustration? Overhead वाढवून घेतलाय ‘त्याने’ ह्या सगळ्यात..पाप-पुण्याचे हिशोब ठेवणा-यापैकी पापं नोंदणारी team overtime करून करून थकत असेल..
कुठवर चालणार हे सगळं? निर्भयपणे वावरायची सोय नाही. धाक-धुक…असं घाबरत जगण्याला ‘जगणं’ तरी कसं म्हणावं? आताच हे हाल, पुढच्या पिढीचं काय? ‘जग खूप सुंदर आहे’ असं म्हणत त्यांना घडवायचं की ‘पाउल पाउल जपून टाक’ म्हणून बिचकत जगायला शिकवायचं? स्वत:च अश्या दोलायमान स्थितीत राहत पालकत्व तरी कसं पेलायचं? नुसतेच प्रश्न…
बरं, माणसाची पापं नुसती माणसांप्रतीच directed नाहीत…निसर्गाचं सुद्धा तेवढंच खेळणं करून बसलाय माणूस…निसर्गाच्या विरुद्ध जाणं घातकच..कुठल्या न कुठल्या रुपानं त्याची साक्ष द्यायला सुरुवातही केलीये निसर्गानं…सगळं बघून असंही वाटून जातं, ‘होऊन जाऊ दे प्रलय एकदाचा’…नव्याने सगळं सुरु करायची तेवढीच एक संधी…पण पुन्हा वाटतं, असाच काहीसा विचार करून एक नवीन संधी मिळाली असेल माणसाला अन त्या संधीचं रुपांतर माणसाने आज जे काही दिसतंय त्यात केलं असेल…quite possible.
बहीणाबाईनी म्हणलेलं ‘मानसा मानसा, कधी होशील मानूस’ स्थल-कालपरत्वे जसंच्या तसं applicable आहे…

contradictions….

5 प्रतिक्रिया

येता-जाता कधी-कधी अश्या काही गोष्टी बघायला/अनुभवायला मिळतात की आपण कितीही तंद्रीत असलो तरी क्षणभरासाठी तंद्रीमधून बाहेर पडतो, कधी हसायला येतं तर कधी पुन्हा नवीन तंद्री लागते समोरची गोष्ट बघून. अश्याच काही:
* पडक्या, जुनाट भींतीवर ‘अंबुजा’ सिमेंट ची जाहीरात…
* उजाडलेल्या वस्तीमध्ये त्यातल्या त्यात चांगल्या स्थितीत असलेल्या एका चाळवजा इमारतीवर आधुनिक flats च्या scheme चे भले-मोठे hoarding. त्यावरची punch line जास्त छळते…
e.g. ‘Be a world citizen’!!!
* ‘XYZ Garden Restaurant’…entrance ला दोन शोभेच्या palm ची झाडं…पाटीत ‘garden’ फुलायला पुरे आहे…
* Most common…’येथे कचरा टाकू नये’ च्या आजू-बाजूला सगळ्यात जास्त कचरा…
* ‘Aspirations’ लिहिण्यासाठी दिलेल्या जागेला ‘Max 200 characters allowed’ चा disclaimer…चीड चीड…
* बाहेर लख्ख, कडक उन अन इकडे आत बस मधून office ला जाताना गाणं सुरु झालं..’सावन बरसे तरसे दिल..’ गाणं, पण कुठल्याच angle ने connect नाही झालं..
* Latest…{Disclaimer: द्रविड द्वेष्टी वगैरे नाही, अन द्रविड चाहत्यांच्या भावना दुखवायचाही अजिबात हेतू नाही…} राहुल द्रविड aggressive झालाय last 2-3 IPL matches पासून…6 काय!!! अशी contradictions मात्र छान वाटतात :)

जुने लेख

Follow

Get every new post delivered to your Inbox.